बुलढाणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘राजमाता महोत्सवा’ची दिमाखात सांगता!
५ दिवसांत ४० लाखांची उलाढाल; सातपुडा उत्पादक समूहाचा 'पेटीकोट' उत्पादनात प्रथम क्रमांक

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: ग्रामीण महिलांच्या कलागुणांना आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणाऱ्या ‘राजमाता महोत्सव २०२६’ चा सोमवारी (९ मार्च) मोठ्या उत्साहात समारोप झाला. गेल्या पाच दिवसांत बुलढाणेकरांनी या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला असून, विक्रीचा आकडा तब्बल ४० लाख १२ हजार रुपयांच्या पार गेला आहे. जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे हा सोहळा संपन्न झाला.
महोत्सवाच्या सांगता समारंभाला जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (धुळे) राजेश इंगळे आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ५ मार्च रोजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ झाला होता.
४० लाखांची विक्रमी विक्री उमेद अभियान
जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात फूड स्टॉल्स आणि हस्तकला व इतर वस्तूंना नागरिकांनी मोठी पसंती दिली. ५ दिवसांत ४० लाख १२ हजार रुपयांची विक्री झाली. विशेषतः सायंकाळच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी महोत्सवाची रंगत अधिकच वाढवली.
उत्पादनांचे ब्रँडिंग आणि ई-मार्केटिंगवर भर
जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “बचत गटांच्या उत्पादनांचे वैशिष्ट्य जपणे गरजेचे आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आता उत्पादने ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर नेण्याची गरज आहे.” तर मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्याचा स्वतंत्र ब्रँड तयार करण्याच्या सूचना उमेद विभागाला दिल्या.उत्कृष्ट गटांचा गौरव महोत्सवाच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १० गटांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावणारे गट खालीलप्रमाणे:
प्रथम रजनी वेरूळकर (सातपुडा समूह, सोनाळा) पेटीकोट उत्पादन १०,००० रु. व मानपत्र
द्वितीय प्रियंका वकटे (समृद्धी समूह, नांदुरा) बॉल पेन व घासणी ७,००० रु. व मानपत्र
तृतीय पूजा देशमुख (सावित्रीबाई फुले गट, मलकापूर) पापड व चिप्स
या महोत्सवाच्या यशस्वीतेमुळे ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना मोठे प्रोत्साहन मिळाले असून, पुढील वर्षभरातील त्यांच्या उद्योगासाठी मोठी ऊर्जा मिळाली आहे.




