महाराष्ट्र शोकाकुल: लोकनेता अजितदादा पवार अनंतात विलीन
अमित शाह, नितीन गडकरींसह केंद्रातील दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवरहाऊस’ म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित असलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
विमान अपघातात काळाचा घाला
बुधवारी (२८ जानेवारी) सकाळी ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे येत असताना अजितदादांच्या ‘चार्टर्ड प्लेन’ला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमानाने पेट घेतला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत अजितदादांसह पायलट, को-पायलट आणि दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला.
देशभरातील नेत्यांची उपस्थिती आणि श्रद्धांजली
अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी दिल्लीहून केंद्रातील अनेक बडे मंत्री बारामतीत दाखल झाले होते. यात प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांचा समावेश होता.
या नेत्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.
अमित शाह: “अजितदादांच्या निधनाने देशाने एक उत्तम प्रशासक आणि जमिनीवरचा नेता गमावला आहे.”
नितीन गडकरी: “राजकारणापलीकडचे मैत्री जपणारा हा नेता असा अचानक निघून जाईल असे वाटले नव्हते.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: “मी माझा एक जिवाभावाचा आणि कार्यक्षम मित्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या विकासाची मोठी हानी झाली आहे.”
शरद पवार: “एका कष्टाळू आणि धाडसी नेतृत्वाचा असा अंत होणे, हे संपूर्ण कुटुंबासाठी आणि राज्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे.” यावेळी सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील आजी-माजी आमदार आणि सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा
अजितदादांच्या निधनामुळे राज्य सरकारने २८ ते ३० जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले असून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
एक झंझावाती कारकीर्द
६६ वर्षांचे अजितदादा आपल्या रोखठोक शैलीसाठी आणि प्रशासनावरील पकडीसाठी ओळखले जात. तब्बल ६ वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे ते महाराष्ट्राचे एकमेव नेते ठरले. बारामतीचा कायापालट करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
”दादा अमर रहे…” अशा घोषणांनी संपूर्ण बारामती परिसर आज दुमदुमून गेला होता. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा असा अकाली अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




