बुलढाणा हादरले! उच्चभ्रू कुटुंबातील मायलेकांसह जिल्ह्यातून एकाच दिवशी ७ जण गायब; मलकापुरात खळबळ
१६४८ बेपत्ता व्यक्तींच्या आकड्याने जिल्हा पोलीस दल चिंतेत!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात व्यक्ती बेपत्ता होण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. मलकापूर शहरातील एका उच्चभ्रू कुटुंबातील आईसह दोन चिमुकली मुले संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, संपूर्ण जिल्ह्यातून एकाच दिवसात एकूण सात जण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बेपत्ता व्यक्तींचा आकडा धडकी भरवणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील हनुमान नगर परिसरातील रहिवासी वसंत कुमार पटेल यांची पत्नी मित्तल पटेल (३२ वर्ष), मुलगी सिया पटेल (११ वर्ष) आणि मुलगा देवांश पटेल (०८ वर्ष) हे तिघे बाजारपेठेत काही वस्तू आणण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर पटेल यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्य अशा प्रकारे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
एकाच दिवसात ७ जण गायब; जिल्हा ‘मिMissing हब’ होतोय का?
धक्कादायक बाब म्हणजे, केवळ मलकापूरच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागांतून एकाच दिवशी पटेल कुटुंबासह एकूण ७ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांत प्राप्त झाल्या आहेत. घराबाहेर पडलेली माणसे सुरक्षित घरी परततील की नाही, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.
आकडेवारी भीतीदायक: ९८० महिला-मुलींचा समावेश!
जिल्ह्यात बेपत्ता होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार:
२०२५ मधील एकूण बेपत्ता: १६४८ जण.
बेपत्ता महिला व मुली: ९८० (एकूण संख्येच्या ६०% पेक्षा जास्त). यापैकी काही जणांचा शोध लागला असला तरी, अद्यापही मोठी संख्या पोलिसांच्या रेकॉर्डवर ‘बेपत्ता’ म्हणूनच आहे.




